प्रेम ही घटना नाही,
ती एक अवस्था आहे —
जिथे मिळणं आणि गमावणं
दोन्ही अर्थ हरवून बसतात.
जिथे अपेक्षा जन्म घेण्याआधीच
मौनात विलीन होते,
आणि स्वार्थ
स्वतःची ओळख विसरतो.
प्रेमात देणं हे कर्तव्य नसतं,
ते सहज घडतं —
श्वास घेतल्यासारखं,
विचार न करता.
काय दिलं, केव्हा दिलं,
याची नोंद ठेवली
की प्रेम राहात नाही,
तो व्यवहार होतो.
देणं इतकं पूर्ण असावं
की देणारा आणि घेणारा
या सीमाच विरघळून जाव्यात,
आणि उरावं फक्त
एक ओलसर शांत अस्तित्व.
तेव्हा
कोण देतंय, कोण घेतंय
हा प्रश्नही अर्थहीन होतो.
प्रेम व्याकरणात बसत नाही,
ते शब्दांना न जुमानणारे सत्य आहे;
त्याला काना-मात्रा नाहीत,
आणि अर्थ सांगणारी
दुसरी संज्ञाही नाही.
समर्पण हे त्याचं नाव नाही,
तर त्याची परिणती आहे.
प्रेम एकालाच लागू असतं
असं नाही;
ते प्रत्येकात असतं,
पण अटींमध्ये अडकलेलं.
जेव्हा आपण निकष ठेवतो,
तेव्हा आपण स्वतःलाच
प्रेमापासून दूर ढकलतो.
आणि मग लक्षात येतं —
प्रेम हरवत नाही,
आपणच त्यातून
माघार घेतलेली असते.
प्रेम म्हणजे
त्यागाची उदात्त भावना नाही,
प्रेम म्हणजे
त्याग घडतो ती
स्वाभाविक शांत अवस्था.....
No comments:
Post a Comment